पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहाबाबतीत मात्र असे झालेले नाही. अवघ्या एका महिन्यात या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती संपली असून, दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यात होणार आहे.
संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह २० डिसेंबर २०१९ रोजी मुंबईत प्रकाशित झाला. यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरले आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही ते पुस्तक प्रकाशित झाले आहे. २३ जानेवारीला असलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून या हस्तलिखित पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्या दिवशी प्रकाशित केली जाणार आहे.
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २३ जानेवारीला पुण्यात होणार असून, या कार्यक्रमाला अभिनेत्री मुक्ता बर्वेही उपस्थित राहणार आहे. कवितासंग्रहातील निवडक कविता, गजलांचे गायन आणि अभिवाचन या वेळी केले जाणार आहे. मुक्ता बर्वेसह मिलिंद आणि मनीषा जोशी हे दाम्पत्य हे सादरीकरण करणार आहे.
नव्या पेठेतील पत्रकार भवनात २३ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रसिक वाचकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मिलिंद आणि मनीषा जोशी, तसेच ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर आणि संचालिका सुप्रिया लिमये यांनी केले आहे.